Posted by: Milind Mohan Arolkar | जानेवारी 27, 2011

निळ्या ज्योतीचे नंदनवन- ३ (अंतिम)

बंधारा बांधला की…

बंधारा बांधला की…कालपर्यंत वाहात असलेल्या लहानश्या ओढ्याचे रूपांतर जेव्हा जलाशयात होते, तेव्हा त्याचा दृश्य परिणाम फार मोठा असतो. तो पाहाणा-याच्या मनावर अधिक होतो. त्या भागात जे लोक राहातात त्यांच्या मनोबलावर सकारात्मक परिणाम झालेला असतो. असाच परिणाम ज्या ज्या वाड्यांमध्ये डॉक्टरांनी बंधारे बांधले, तिथल्या ग्रामस्थांवर झाला. बंधा-यांच्या पाण्याच्या आधारावार काहींनी चक्कं कलिंगडं लावली. पीक भरपूर आलं. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर या कलिंगडांचे स्टॉल लागले. ऑक्टोबरच्या उन्हात ही कलिंगडं प्रवाश्यांना खुणाऊ लागली. गाड्यांच्या चाकांनी आपोआप स्टॉलवर गर्दी केली. उत्पनाचा नवा महामार्ग या निमिताने शेतक-यांनी अनुभवला. बंधा-याचं महत्व सर्वांना पटलं. पारंपारिक जलव्यवस्थापनाची आधुनिक मांडणी करताना डॉक्टर देवधरांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. एका वाडीत बांधलेला बंधारा पुढच्या वाडीतील लोक येऊन गुपचूप फोडून जात. आपल्याला पाणी मिळणार नाही या भीती सोबत नाठाळपणाचाही भाग त्यात असे. त्यावर उपाय म्हणून बंधारा बांधायला सुरूवात होण्या पूर्वी स्थानिक देवाला म्हणजे रामेश्वर, सातेरी, रवळनाथ, भवाईदेवी, वेतोबा अशा ग्रामदेवतांना ज्येष्ठ नागरिकांनी नारळ वाढवून गा-हाणी घालण्याची पध्दत सुरू झाली. त्यात बंधा-याची काळजी घे यासोबतच कोणी बंधारा फोडला तर त्याला शिक्षा कर असेही कलम घातले गेले. देवाच्या कोपाच्या भीतीने नाठाळपणाला पायबंद बसला आणि हे देवाचे काम म्हणून सर्वांचा सहभागही  वाढला.

या काळातच डॉक्टर प्रसाद आणि हर्षदा देवधर यांच्या व्यक्तिगत प्रयत्नातून सुरू झालेल्या कामाचं रूपांतर भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेत झालं. अनेक कार्यकर्ते स्वतःहून या कामात जोडले गेले.

उपाय निघाला बायोगॅसचा

बंधा-यांची चळवळ जोरात असतानाच ज्या कारणासाठी जंगलतोड होत होती, त्या घरगुती इंधनाकडे डॉक्टर देवधरांनी मोर्चा वळवला.

त्यावर उपाय निघाला बायोगॅसचा. अनुदान मिळतं म्हणून गावात काहींनी बायोगॅस बांधलेही होते. परंतु ते नादुरूस्त तरी होते किंवा शौचालयाला जोडलेले नव्हते. शौचासाठी बाहेर जाण्याचं प्रमाण गावात जास्त असतंच. बायोगॅस बांधून ते जर शौचालयाला जोडले, तर अधिक प्रमाणात घरगुती इंधन सहज उपलब्ध होतेच पण जी स्लरी बाहेर पडते ती बागायतीसाठी उत्तम खत म्हणून वापरली जाऊ शकते याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘भगीरथ’ च्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली. संस्थेच्या ‘बायोगॅस डॉक्टर’ कार्यकर्त्यांनी जुने व नादुरूस्त झालेले बायोगॅस कार्यान्वित केले. आजमितीला १० गावांमध्ये फेरो सिमेंट मॉडेलचे ३५० बायोगॅस- निळ्या ज्योतीची नंदनवने- कार्यान्वित झाले आहेत. गावातील गवंडी बायोगॅस बांधण्याच्या तंत्रज्ञानात प्रवीण झाले आहेत. ते आता बायोगॅस बांधणी तंत्रज्ञानाचे अभ्यास शिबिरे घेतात. आता चूलीमुळे घरात पसरणारा धूर विरून गेला आहे, जाताना गृहलक्ष्मीच्या डोळ्यांतील पाणी घेऊन गेलाय. ती आता अधिक स्पष्टपणे आपल्या संसाराकडे पाहू शकते आहे.

गेल्या काही वर्षांच्या अथक प्रयत्नांतून आता समाजालाही डॉक्टर देवधरांच्या कार्याचे महत्व पटते आहे. नाहीतर काही वर्षांपूर्वी हाफपॅंट घालून सायकल चालवीत डॉ. प्रसाद दवाखान्यात जात. उद्देश हाच की जातायेता समाजातील सर्व घटकांशी संवाद व्हावा. काहींनी समज करून घेतला की बहुधा डॉक्टरांना दवाखान्यातून फारसे उत्पन्न होत नसावे. कबीर एका दोह्यात म्हणतो-

सांई इतना दीजिये, जामे कुटुंब समाय,
मै भी भूखा ना रहूँ, साधू न भूखा जाय….

आजपर्यंत समाजासाठी कार्य करणार-या आधुनिक काळातील अनेक ‘साधूं’ चं देवधरांचं घर हे हकाचं ठिकाण आहे. डॉ. प्रसाद अणि हर्षदा यांनी खूप आधीच हे ठरवले आणि स्वीकारले की जोपर्यंत आर्थिक स्थिरता येईपर्यंत दोघांनी दवाखाना चालवायचा आणि एकदा ती आली अशी स्थिती उत्पन्न झाली की केवळ हर्षदा वहीनींनी दवाखाना चालवायचा. ज्या भागात दवाखाना आहे तेथील किमान वैद्यकीय शुल्कापेक्षा कमी शुल्क देवधरांच्या दवाखान्यात आकारले जाते. किंबहुना रूग्णाची आर्थिक स्थिती कमकुवत असेल, तर ते नाकारलेही जाते. एखादे हॉस्पिटल बांधून कायम सोन्याची अंडी देणारी कोंबडी निर्माण करावी असा विचार या दांपत्याने कधी केला असेल असे म्हणायला जागा नाही.

इलाही जमादारांचा एक शेर आहे-

आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःस विकले असते,
एकेक वीट सोन्याची, घर असे बांधले असते…

या ओळींचा खरा अर्थ देवधरांच्या सहवासात मला प्रथम कळला. कोणत्याही स्टेटस सिंबॉलचा स्पर्श स्वतःला न होऊ देता आपल्या मानसी आणि अवधूत या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी गावातील सर्वसामान्य मुले ज्या शाळेत जातात त्याच स्थानिक शाळेत पाठवले.

भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्राम विकासातील एकही मुद्दा डॉक्टरांनी सोडलेला नाही. गावांतील समस्या कोणतातरी एक प्रश्न सोडवून संपत नाहीत. कारण त्यांचे मूळ कारण दुस-याच समस्येत लपलेले असते. समस्यांची एकमेकात असलेली गुंफण ज्याला लक्षात आली, त्याला ग्रामविकासाची नाडी कळली असे म्हणता येईल. प्रसाद व हर्षदा या कसलेल्या डॉक्टरद्वयाला ती न कळली तर नवलच. शेती, शेतीला पूरक उद्योग, शिक्षण, अपारंपारिक उर्जास्रोत, महिला व बालकल्याण, आरोग्य या विषयांना घेऊन आज भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप पंचक्रोशीत कार्य करीत आहे. ग्रामविकासाचे हे प्रयत्न पाहायला येणा-यांना काही शुल्क आकारले जाते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की शुल्काचे नाव काढल्यावर हवशे, नवशे यांची संख्य़ा कमी होते, वेळ वाचतो. ज्यांना खरेच काम पाहाण्यात रस आहे, त्यांना ते असे काही कळते की त्यांची पावले परत परत आकेरीच्या दिशेने वळतात.

डॉ. देवधरांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक सन्मान मिळत असतात. या पुरस्कार देणा-यांच्या बाबतीत चोखंदळ राहाणारे देवधरांसारखे क्वचितच सापडतील. भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान च्या कार्याला देणगी देणा-यांची काही अट असेल आणि ती काम करण्यामागच्या मूळ सूत्राच्या आड येत असेल तर विनम्रतेने ती नाकारण्याचे ‘धाडस’ डॉ. प्रसाद यांनी दाखविलेले आहे. सामाजिक काम करताना स्वाभाविक पणे येणारा स्वतःचा अहंकार डॉ. प्रसाद यांनी सहजतेने दूर ठेवला आहे. किंबहुना, सामाजिक काम ज्यावेळी व्यक्तिगत पातळीवर होते त्यावेळी अपमान आणि उपेक्षेचे कटू अनुभव त्यांनी एक अपरिहार्यता म्हणून स्वीकारलेले आहेत. त्यामुळेच सामाजिक कार्याला ‘आहे म्हणून’ देणगी देणा-याचा अहंकार त्यांना सलतो.  आज भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानची घडी व्यवस्थित बसवून सामाजिक काम प्रथमावस्थेत असणा-या संस्था व समाजासाठी धडपडणा-या कार्यकर्त्यांचे पालकत्व डॉ. प्रसाद यांनी स्वीकारले आहे.

डॉ. देवधर गेले दशकभर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत आहेत, त्यांनी गावात केलेले ग्रामविकासाचे, जलसंवर्धनाचे प्रयोग, त्यामागची भूमिका, आलेले अनुभव हे सर्व फार जवळून पाहाण्याची व ते काम अनुभवण्याची संधी मला लाभली. आयुष्यभर डॉक्टरकी करून, सोन्याची वीटेचे घर बांधण्याची सर्व शक्यता असताना, आकेरी सारख्या लहान गावात राहून डॉ. प्रसाद आणि हर्षदा देवधर यांनी समाज आपले घर मानले. भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान च्या रूपाने या भावनेचे व्यक्त स्वरूप असे पथदर्शक काम उभे राहीले आहे. अशी निळ्या ज्योतीच्या नंदनवने अनेक ठिकाणी उभी राहू शकतात, गरज आहे एका गवंड्याची…डॉ. प्रसाद देवधरांसारख्या!

संपर्कासाठी: डॉ. प्रसाद देवधर –
Mo: 9422596500,
Email: bhagirathgram@gmail.com
Website: www.bhagirathgram.org/

 


प्रतिसाद

  1. मिलिंद ,
    लेख उत्तमच झाला आहे . डॉ . देवधर दांपत्याच्या कार्याविषयी सविस्तर माहिती मिळाली हे उत्तम झाले . या माध्यमातून ही प्रेरणाज्योत अनेकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद .या आधीचे दोन्ही भाग देखील छान लिहिले होते .भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान ला शुभेच्छा .

  2. मिलिंद,

    डॉ. देवधरांच्या कामाबद्दल उडत उडत बरच ऐकलं होत. पण तुझे लिखाण वाचून प्रत्यक्ष बघण्याची उत्सुकता निर्माण झाली.

    अशाच पद्धतीने वेगवेगळया सामाजिक कामांबद्दल, विशेषत: ज्यांच्याबद्दल दुसरे कोणी कदाचित लिहिणार नाही, त्यांच्याबद्दल लिहिणार आहेsa का? वाचायला फार मजा येईल.

  3. होय. नक्की लिहीणार आहे. या नंतरचा पोस्ट समतोल फाऊंडेशन वर असेल..प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

  4. सुमेधा, प्रतिसादा्बद्दल धन्यवाद!


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 65 other followers